आखाडा | मुंबई/दिल्ली : पंजाब दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’बाबत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाजन यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांचे ते वक्तव्य म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट करत भाजपने या वादातून स्वतःला बाजूला केले आहे.
नक्की काय घडलं?
अमृतसरमध्ये १९८४ साली झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला नुकतीच ४२ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी “ऑपरेशन ब्लू स्टार हा एक काळा दिवस होता” असे वक्तव्य केले. त्यांच्या याच विधानामुळे दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत.
भाजप श्रेष्ठींची नाराजी; वैयक्तिक मत असल्याचा निर्वाळा
गिरीश महाजन यांच्या या विधानानंतर भाजपच्या केंद्रीय वर्तुळातून तातडीने प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपच्या वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार:
-
गिरीश महाजन यांनी मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही.
-
कदाचित या विषयाची पूर्ण माहिती नसल्यामुळे महाजन यांच्याकडून असे वक्तव्य झाले असावे.
-
भाजपच्या कोणत्याही रणनीतीशी या कार्यक्रमाचा किंवा वक्तव्याचा संबंध नाही; अशी कोणतीही भूमिका पक्षाला अजिबात मान्य नाही.
‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या ४२ व्या वर्षपूर्तीलाच देशात मोठ्या घातपाताची धमकी?
दरम्यान, ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला ४२ वर्षे पूर्ण झाली असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईचा बदला घेण्यासाठी देशातील तीन मुख्य सरकारी कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक मेल आल्याचे समजते आहे.
तपास यंत्रणा सतर्क हा धमकीचा मेल ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ने पाठवला आहे का? यादृष्टीने आता तपास यंत्रणांनी कसून चौकशी सुरू केली आहे. एका बाजूला राजकीय वाद आणि दुसऱ्या बाजूला आलेली ही धमकी, यामुळे सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत.


