जळगाव (नचिकेत चौधरी) : जिल्हाची प्रमुख कृषी ओळख असलेल्या आणि जी.आय. मानांकन (GI Tag) प्राप्त ‘जळगाव केळी’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगावच्या केळीला जागतिक बाजारपेठेत सक्षमपणे पोहोचवण्यासाठी आणि निर्यात साखळीतील तांत्रिक बाजू बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने आज जिल्ह्याचा दौरा केला. दिवसभरात जिल्ह्यातील निर्यात पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.
केंद्रीय व राज्य पातळीवरील तज्ज्ञांची उपस्थिती :
या महत्त्वपूर्ण बैठकीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये ‘एनसीसीडी’चे (NCCD) सीओओ श्री. आशिष फोतेदार व सल्लागार श्री. प्रितम सरकार, ‘एमआयडीएच’चे (MIDH) श्री. राहुल कुमार, ‘आयसीएआर’चे (ICAR) प्रधान शास्त्रज्ञ डॉ. पी. सुरेश कुमार व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. प्रभू, ‘अॅपेडा’चे (APEDA) श्री. वाघमारे, ‘हॅलकॉन’चे (HALCON) सीईओ तथा नोडल ऑफिसर श्री. सतीश गरजे, नाशिक ‘एनएचबी’चे (NHB) प्रादेशिक अधिकारी आणि जळगावचे कृषी उपसंचालक श्री. भरत इंगळे आदींचा समावेश होता.
बैठकीतील प्रमुख प्रशासकीय मुद्दे व सविस्तर चर्चा :
पायाभूत सुविधांचे बळकटीकरण: जळगाव जिल्ह्यातील केळी निर्यातीला गती देण्यासाठी आवश्यक असणारे प्री-कूलिंग युनिट्स, पॅक हाउसेस आणि रीफर कंटेनर्स या पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली.
अडचणींचे निवारण व लॉजिस्टिक्स: केळी निर्यातीदरम्यान वाहतुकीचे अडथळे आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करून निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबत विचारविनिमय झाला.
जागतिक गुणवत्ता मानके: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कडक मानकांचे पालन करून कीडमुक्त व दर्जेदार केळी उत्पादनासाठी शेतकर्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात आला.
शीतसाखळी व्यवस्थापन (Cold Chain): काढणीपश्चात केळीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील शीतसाखळी व्यवस्थापनाचा दर्जा उंचावण्याबाबत सविस्तर तांत्रिक चर्चा झाली.
भविष्यासाठी कृती आराखडा: केंद्र सरकारच्या विविध योजनांचा जिल्ह्यात प्रभावी समन्वय साधून आगामी काळासाठी एक ठोस व कालबद्ध कृती आराखडा निश्चित करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
जिल्हा प्रशासनाचा संकल्प :
जळगावची केळी जागतिक बाजारपेठेत पोहोचवून उत्पादक शेतकर्यांना थेट आंतरराष्ट्रीय विपणन (Marketing) साखळीशी जोडणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी आणि शेतकर्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.
“जळगावच्या केळीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याची अथांग क्षमता आहे. केंद्रीय पथकासोबत झालेल्या या सखोल चर्चेच्या आधारे, जिल्ह्यातील निर्यातदार आणि शेतकर्यांना भेडसावणार्या अडचणी दूर करून दर्जेदार पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यास जिल्हा प्रशासन प्राधान्य देईल.”
— जिल्हा प्रशासन, जळगाव


