आखाडा | (विशेष प्रतिनिधी) मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज २ जून रोजी राज्य मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील बळीराजासाठी अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना’ लागू करण्यास मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली आहे.
३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी, ६५ लाख खाती होणार नील
या योजनेअंतर्गत राज्य सरकार तब्बल ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देणार असून, यामुळे राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे ६५ लाखांहून अधिक कर्जखात्यांवरचे कर्ज माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकार शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे.
नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन
केवळ थकबाकीदारच नव्हे, तर प्रामाणिकपणे आणि नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. अशा नियमित कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहननिधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
आचारसंहितेमुळे अधिकृत घोषणा नाही, पण परिपत्रक निघणार
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाने या निर्णयाच्या जाहीर घोषणेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत निर्णय होऊनही त्याची थेट घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग लवकरच अटी व शर्तींचे परिपत्रक (G.R.) काढणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
थोडक्यात काय तर…
अर्थसंकल्पातील घोषणेनंतर गठीत केलेल्या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर आज मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. आचारसंहितेचा तांत्रिक अडसर असला तरी, प्रशासकीय पातळीवर सहकार विभागाच्या परिपत्रकासह कर्जमाफीच्या अंमलबजावणीची तयारी पूर्ण झाली आहे.


