आखाडा (विशेष प्रतिनिधी) | मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफीबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयासोबतच कर्जमाफीची पुढील संपूर्ण प्रक्रियाही तातडीने सुरू करण्यात येणार आहे. मात्र, निर्णय होऊनही याची अधिकृत घोषणा आज केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आचारसंहितेचा अडसर
याबाबत अधिक माहिती देताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेच्या नियमांमुळे निवडणूक आयोगाने या मोठ्या निर्णयाची जाहीर घोषणा करण्यास सरकारला परवानगी दिलेली नाही.
निर्णय होणार, प्रक्रियाही सुरू होणार
निवडणूक आयोगाच्या तांत्रिक अडचणींमुळे घोषणा रखडली असली तरी सरकार पातळीवर कामाला गती दिली जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल आणि अंतर्गत प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल, जेणेकरून आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांना याचा थेट लाभ देता येईल.
“आज मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होईल आणि त्यानंतर सर्व प्रक्रियाही सुरू होणार आहे. पण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाने घोषणा करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे आज निर्णय होईल पण घोषणा होणार नाही.”
— देवेंद्र फडणवीस
निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे निर्णय होऊनही शेतकऱ्यांना अधिकृत घोषणेसाठी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आचारसंहिता संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.


